मुंबई : कधीकाळी नाशिक जिल्ह्याच्या शिवसेनेच्या राजकारणात उध्दव ठाकरे यांचे खास विश्वासू मानले जाणारे वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांना मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये त्यांच्या समर्थकांसह प्रवेश देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे चांगल्याच संतापल्या. भाजपवर तोंडसुख घेताना त्या गरजल्या की, ‘नितीश कुमारांपेक्षा मोठे पलटूराम महाराष्ट्रात आहेत….”कारण बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ‘पलटूराम’ म्हणून उपहासाने हिणवले जाते.
रोहिणी खडसे यांनी आज त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवरून तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “ज्यांच्यावर भाजपच्याच नेत्यांनी दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप केला होता, भर अधिवेशनात त्यांच्या नाचतानाच्या सीडी दाखवल्या होत्या, त्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशल एस आय टी स्थापून चौकशीची घोषणाही केली होती, भाजप नेत्यांनी त्यांच्यावर हिंदू धर्माशी गद्दारी केल्याचाही ठपका ठेवला होता, त्या बडगुजरांना आज भाजपने आपल्या घरात घेतलं… कारण भाजपची वॉशिंग मशीन फिरली की माणसे चकाचक होतात…..! अशा परखड शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी खडसे यांनी भाजपवर दुहेरी भूमिका घेणारा पक्ष असा गंभीर आरोप करताना सांगितले की, “कधीकाळी ज्यांना हेच बडगुजर हिरवे वाटत होते, ते आज भगवामय झाले आहेत… कारण सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी भाजप कोणालाही अंगीकारते……!”
सुधाकर बडगुजर यांना भाजपात प्रवेश देण्यात येऊ नये यासाठी स्थानिक भाजप नेते व पदाधिकारी तसेच आमदार सीमा हिरे यांचाही प्रखर विरोध होता. त्यामुळेच की काय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अखेरपर्यंत बडगुजर यांना कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक व कट्टर समर्थक मंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रवेश बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अंधारात ठेवून केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेने करून घेतला अशा चर्चांना पेव फुटला आहे. एरव्ही एखाद्या नेता असो वा पदाधिकारी, माजी आमदार असो वा खासदार वा नगरसेवक त्यांचा भाजपात प्रवेश हा मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात घेतला जातो. मात्र ऐन वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बावनकुळे व रविंद्र चव्हाण यांना फोन करून बडगुजार यांना पक्षात प्रवेश देण्याचे फर्मान सोडले तेंव्हा क्षणाचाही विचार न करता दोन्ही नेते नाशिकला तातडीने रवाना झाले व बडगुजर यांना अधिकृतरित्या भाजपात प्रवेश देण्यात आला. मात्र हेच बडगुजर काही वर्षांपूर्वी भाजप नेत्यांच्या टार्गेटवर होते, हेही खडसे यांनी ठळकपणे दाखवून दिलं.
या प्रवेशामुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, रोहिणी खडसे यांच्या टीकेने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकारणात कोण ‘पलटूराम’ आणि कोण ‘वॉशिंग मशीन’मध्ये स्वच्छ झाला, हे ठरवणं जनतेवर सोपवू, या खडसे यांच्या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचे वादळ पुन्हा नव्याने तोंड वर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.