मुंबई: बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी चारकोप, सेक्टर ८ परिसरात कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या पाइलिंग कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीती व चिंतेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना औपचारिक पत्र पाठवले आहे.
११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या पाइलिंग कामामुळे परिसरातील इमारतींमध्ये तीव्र कंपने जाणवत असून नागरिकांमध्ये भूकंपसदृश भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या कामास सुरुवात करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना किंवा सल्लामसलत करण्यात आलेली नव्हती, असा गंभीर आरोप आमदार उपाध्याय यांनी केला आहे.
पत्रात आमदार संजय उपाध्याय यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत :
• कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी संबंधित रहिवाशांना संपूर्ण माहिती देऊन त्यांची मते जाणून घ्यावीत
• परिसरातील सर्व लगतच्या इमारतींची संरचनात्मक तपासणी व्हीजेटीआय अथवा आयआयटीसारख्या नामांकित संस्थांच्या तज्ज्ञांकडून करावी
• कामादरम्यान कोणतीही हानी किंवा दुर्घटना होणार नाही, याची लेखी हमी द्यावी
• नुकसान किंवा अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचे लेखी आश्वासन द्यावे
• सर्व बांधकाम नियम व सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे
• कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ जबाबदार अधिकारी नेमून त्यांची सतत उपस्थिती सुनिश्चित करावी
• प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करावी
• रहिवाशांचे जीवन, सुरक्षितता आणि कल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे
आमदार संजय उपाध्याय यांनी स्पष्ट केले आहे की ते कोस्टल रोड प्रकल्पाच्या विरोधात नाहीत. मात्र, विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ नये, हीच त्यांची प्रमुख भूमिका असून प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी त्यांनी मागणी केली आहे.

