मुंबई : मुंबई शहरासाठी नैसर्गिक संरक्षण कवच मानली जाणारी कांदळवने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि अनधिकृत भरावामुळे धोक्यात आली असल्याचा गंभीर मुद्दा भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत उपस्थित केला.
बोरिवली विधानसभा क्षेत्रातील मानोरी, मालवणी, गणपत पाटील नगर तसेच इतर परिसरात कांदळवन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकून भराव, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे होत असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
उपाध्याय यांनी निवेदनात सांगितले की, कांदळवन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकून भराव केला जात आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या ५० मीटर बफर झोनमध्येही अतिक्रमणे केली जात आहेत. या भागात झोपड्या तसेच इतर प्रकारची अनधिकृत बांधकामे उभारली जात असल्यामुळे स्थानिक पर्यावरण, जैवविविधता आणि मुंबईच्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, कांदळवने ही मुंबईसाठी पूर, वादळे आणि समुद्राच्या भरतीपासून संरक्षण करणारी नैसर्गिक भिंत मानली जातात. त्यामुळे कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमण हा केवळ पर्यावरणीय प्रश्न नसून शहराच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय आहे.
या पार्श्वभूमीवर कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणे तातडीने हटवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित विभागांना नियमित देखरेखीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी उपाध्याय यांनी केली.

