महाराष्ट्र ताज्या बातम्या

सातारा ZP निवडणुकीत ‘लोकशाहीचा खून’? पोलिसांवर गंभीर आरोप; विधानसभेत स्फोटक खडाजंगी

Devendra Fadnavis speaking in Maharashtra Assembly on Satara Zilla Parishad election controversy and police action

मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित हिंसाचाराचे तीव्र पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मतदानापासून सदस्यांना रोखल्याच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत, “मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया विधानपरिषदेत दिली.

या प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या प्रिया शिंदे आणि राजू भोसले विजयी झाले. मात्र या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला हिंसेचे गालबोट लागल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

विधानसभेत माहिती देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, मतदानासाठी जात असताना त्यांना आणि इतर सदस्यांना पोलिसांनी अडवले. “आरोपींना जसे फरफटत नेतात, तसे आम्हाला नेण्यात आले. मला दुखापत झाली असून चार दिवसांपासून उपचार घेत आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे असा आरोप केला की, जिल्हा परिषदेमधील संख्याबळ कमी करण्यासाठी हे सर्व घडवण्यात आले. यामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोषी, एलसीबीचे निरीक्षक देवकर आणि सहाय्यक निरीक्षक गर्जे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या घटनेचा उल्लेख करत सांगितले की, त्यांनी स्वतः पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदस्यांना मतदान करू द्यावे असे निर्देश दिले होते. तरीही सदस्यांना मतदानापासून रोखण्यात आले, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

“पोलीस मंत्री आणि लोकप्रतिनिधींना आरोपींसारखे वागवले जाणे, हा राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रकार आहे,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे जाहीर केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात