महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-दापोली रस्त्यावर अपघातांची मालिका कायम; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाड : महाड-दापोली राज्य मार्गावरील करंजाडी येथील उतारावर ठेकेदाराने मनमानी पद्धतीने टाकलेला अनधिकृत स्पीड ब्रेकर अपघातास कारणीभूत ठरत आहे. नुकताच या ठिकाणी एक अवजड ट्रक घसरून रस्त्याच्या बाजूला धडकला असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून, या सगळ्याची जबाबदारी ठेकेदारावर टाकत, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाड-दापोली मार्गावर गेल्या आठवड्यात रस्त्याच्या पृष्ठभागावर खडी टाकून रोलरने दाबण्याचा प्रयोग करण्यात आला होता. तो अयशस्वी ठरल्याने स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच ठिकाणी नवा प्रयोग करत अचानकपणे स्पीड ब्रेकर टाकले. मात्र पावसामुळे स्पीड ब्रेकरवर मारलेले पांढरे पट्टे वाहून गेल्याने रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना स्पीड ब्रेकरचा अंदाज न येता गाड्या घसरत आहेत.

या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना, नामफलक वा रिफ्लेक्टर लावले गेलेले नाहीत. त्यामुळे हे स्पीड ब्रेकर नियमबाह्य आणि जीवघेणे असल्याचे वाहनचालक व प्रवासी वर्गाने स्पष्ट केले आहे. अशाच प्रकारच्या स्पीड ब्रेकरमुळे नुकताच एक ट्रक घसरून भिंतीला जाऊन धडकला. यात जीवितहानी झाली नसली तरी भविष्यकाळात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंते अनुपस्थित असताना, ठेकेदाराने मनमानीने केलेले हे काम म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळ आहे. याची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी सरपंच ओझर्डे यांनी केली आहे.

या प्रकरणी महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता सनाळकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, प्रशासन पुढे येऊन तात्काळ कारवाई करते की आणखी एखादा अपघात होईपर्यंत वाट पाहते, हा मोठा प्रश्न स्थानिक नागरिक आणि प्रवासी विचारू लागले आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात