मुंबई : “महायुती सरकार तीन कोटी 17 लाख मते आणि 51.78 टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, ती चीड आणणारी आहे”, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ठणकावले.
बावनकुळे म्हणाले, “आंदोलन व मागण्या मांडण्याचा सर्वांना हक्क आहे. पण चिथावणीखोर, एकेरी व अर्वाच्च भाषा वापरणे, विशेषतः आमच्या आया-बहिणी व नेत्यांच्या कुटुंबियांबाबत बोलणे, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.”
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानाची आठवण करून दिली. “फडणवीस यांनी रात्रंदिवस अभ्यास करून कायदा तयार केला, तो विधिमंडळ व हायकोर्टात टिकला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात तो बाद झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी फडणवीस यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली होती.”
बावनकुळे पुढे म्हणाले की, महायुती सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पूर्ण कटिबद्ध आहे. “आमचे सरकार लुळपांगळ नाही, तर मजबूत आहे. मराठा समाजाला जे काही द्यायचे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच देईल. सरकार मराठा समाजासोबत होते, आहे आणि राहील.”