मुंबई – सत्ताधारी महायुती सरकार आणि विधानसभा अध्यक्षांनी संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने ही नियुक्ती तत्काळ करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा कामकाजाच्या कार्यपद्धतीवर बोलताना वडेट्टीवार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाके आहेत. मात्र, विरोधी पक्षनेता ही चाक असताना तीच सध्या सभागृहात नाही.” त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करणे गरजेचे आहे, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.
“महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची परंपरा नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले असले तरी, त्यांना लगाम घालण्यासाठी आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेता असणे आवश्यक आहे,” असेही वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.
विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये आणि अंतिम आठवड्यात विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी ठेवून सभागृहाचे कामकाज चालवू नये, असे त्यांनी नमूद केले. विधानसभा अध्यक्षांकडे अधिकार असल्याने त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, “सभागृहाचे कामकाज नियमानुसारच चालेल आणि नियुक्त्याही नियमानुसारच करण्यात येतील.”