मुंबई – शहरी नक्षलवादाच्या नावाखाली जनसामान्यांची गळचेपी करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणला गेला असून, हा कायदा आतून-बाहेरून काळा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा ठाम विरोध असून, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मागील आठवड्यात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेत काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी विधानपरिषदेत विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“या कायद्याचा फायदा सरकारला आणि सरकारधार्जिण्या उद्योगपतींनाच होणार आहे. धारावीचा भूखंड गिळंकृत करणारे, गडचिरोलीतील सुरजागड खनिज संपत्ती लाटणारे, शक्तिपीठ मार्गासाठी रेड कार्पेट घालणारे उद्योगपती – यांच्यासाठी हा कायदा आहे. पण या प्रकल्पांना विरोध करणारे आदिवासी, पर्यावरणवादी, धारावीतील स्थानिक नागरिक, शक्तिपीठ प्रकल्पाला विरोध करणारे शेतकरी – यांना तुरुंगात टाकण्याचा मार्ग सरकारने तयार केला आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूदही यात आहे,” असा थेट आरोप सपकाळ यांनी केला.
सरकारचे फक्त कौतुक करा, नाहीतर गप्प बसा, आणि जर विरोध केला तर जनसुरक्षा कायद्याचा बडगा उगारून गप्प करायचं – हाच यामागचा हेतू असल्याची टीकाही त्यांनी केली.
“संविधानाचा विचार मांडणे, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार मांडणे, महात्मा गांधी व तुकडोजी महाराजांचे विचार मांडणे हा नक्षलवाद आहे का? याचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावा. जर हे नक्षलवाद मानत असतील, तर मी असे विचार मांडत राहणार. मला अटक करायची असेल तर फडणवीस यांनी खुशाल करावी,” असे आव्हानही सपकाळ यांनी दिले.