महाराष्ट्र ताज्या बातम्या

सामाजिक-आर्थिक समानतेसाठी राज्यघटना केंद्रस्थानी ठेवून काम करा — सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

मुंबई – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक-आर्थिक समानतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गेली बावीस वर्षे न्यायदेवतेची सेवा करण्याचा खारीचा वाटा उचलता आला, याचे मला समाधान आहे; सरन्यायाधीश पदही मी सेवाच समजतो,” अशी भावना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील सत्कार समारंभात व्यक्त केली.

सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती सभागृहात गवई यांचा सत्कार केला. व्यासपीठावर सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

भूषण गवई यांनी ‘भारताची राज्यघटना’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्रीपाद-कृष्ण कोल्हटकरांची “बहु असोत सुंदर संपन्न की महा” ही कविता उद्धृत केली. “राज्यघटनेचा आत्मा असलेल्या मूलभूत हक्कांवर आणि मार्गदर्शक तत्त्वांवर निष्ठा ठेवली, तरच सामाजिक-आर्थिक समानता साध्य होईल,” असे ते म्हणाले. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जात-पांत बाजूला ठेवून काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. “मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय आहे; देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यक्तींच्या प्रतिष्ठेला स्थान नसते,” असे स्पष्ट करत त्यांनी सर्व शक्तीसंस्थांना—कायदे-मंडळ, मंत्रिमंडळ व न्यायमंडळ—संघटितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कष्टाच्या बळावर सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या मराठी व्यक्तीचा अभिमान वाटतो.” नागपूरमधील झोपडपट्टी पुनर्वसन, ‘झुडुपी जंगल’ प्रश्न अशा निर्णायक निकालांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. “जेव्हा ते निवृत्त होतील, तेव्हा न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णपाने कोरली जातील,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

समारंभाचे सूत्रसंचालन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले, तर आभार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या समारोपास गवई यांनी गोविंदाग्रजांच्या “मंगल देशा पवित्र देशा—महाराष्ट्र देशा” या कवितेच्या ओळी उद्धृत करून उपस्थितांना राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात