मुंबई – सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या झेप संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती महोत्सव निमित्ताने ‘समता महोत्सव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ टी. कांबळे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ तसेच नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झेप संस्थेच्या सात वर्षांच्या कार्याची दखल घेत संस्थेचा गौरव करण्यात आला.
प्रियदर्शिनी जाधव – बेलदार यांच्या नेतृत्वाखाली झेप संस्था गेल्या सात वर्षांपासून भटके-विमुक्त समाज, आदिवासी व कातकरी समुदायासाठी सामाजिक कार्य करत आहे. संविधानिक मूल्यांची जपणूक, महामानवांचे विचार आणि मातृशक्तीचा वारसा पुढे नेण्याचे कार्य झेप संस्था करत आहे. या प्रवासात अनेक अडथळे, संघर्ष, आणि अपमानही आले; मात्र संस्थेने कधीही हार मानली नाही.
या यशात झेप संस्थेला ‘कोरो इंडिया’ या संस्थेची विशेष साथ लाभली. सामाजिक कार्य करताना मिळालेल्या मार्गदर्शनात मुमताज ताई, ललिता धनवते आणि पँथर संजय सावंत यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला आहे. त्यांच्या मोलाच्या पाठबळामुळे संस्थेचे कार्य अधिक परिणामकारक झाले, असे प्रियदर्शिनी यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकृतीच्या वेळी एक विशेष भावनिक क्षण देखील अनुभवास आला. झेप संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना दलित पँथरचे पहिले शहीद भागवत जाधव (अण्णा) यांची पुतणी म्हणून प्रियदर्शिनी जाधव-बेलदार यांची ओळख करून दिली गेली. हा क्षण त्यांच्यासाठी अधिक अभिमानाचा व स्वाभिमानाचा ठरला.
“हा पुरस्कार म्हणजे आम्हाला मिळालेली नवी ऊर्जा, प्रेरणा आणि समाजाप्रतीची जबाबदारी अधिक ठामपणे पार पाडण्याची शपथ आहे,” असे मत प्रियदर्शिनी यांनी व्यक्त केले.