Twitter : @abhaykumar_d
नांदेड
येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. ७० रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना वेळेवर औषधी न मिळाल्यास त्यापैकी काहींचा जीव जाऊ शकतो. २४ तासांत जन्मलेले सहा बालक व ४८ तासांपूर्वी जन्मलेले सहा बालक अशा बारा जणांचा औषध नसल्यामुळे मृत्यू झाला.
याबरोबरच सर्पदंशामुळे (snake bite) रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांचा हायर अँटीबायोटिक (antibiotics) औषधी नसल्यामुळे मृत्यू झाला. तसेच हृदयविकारामुळे (heart attack) एकाचा व प्रसुतीदरम्यान एका महिलेचाही मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरात नातलगांचा हंबरडा ऐकायला येतोय. सर्वत्र जोरजोरात रडण्याच्या किंकाळ्या कानावर येत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांचे मनोधैर्यही खचले आहे.
नांदेड जिल्हा हा कर्नाटक (Karnataka) तसेच तेलंगणा (Telangana) या दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने या दोन्ही राज्यातील अनेक रुग्ण नांदेडलाच उपचारासाठी येत असतात. 'हाफकिन' कडून (Haffkine Institute) औषधांचा पुरवठा न झाल्यामुळेच या रुग्णांना जीव गमवावा लागल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. नांदेडमधील या घटनेमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणा हलली असून उद्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसण मूश्रीफ यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे पथक नांदेडला दाखल होत आहे.
नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Dr Shankarrao Chavan Medical college and Hospital, Nanded) ६०० खाटांची क्षमता आहे. परंतु या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. नांदेडमधील व परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल झालेले व अत्यवस्थ झालेले रुग्ण ऐन वेळेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले जातात. त्यामुळे त्यांना उपचार देत असताना जास्तीचा ताण डॉक्टरांवर तसेच रुग्णालय प्रशासनावर पडतो, असे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी बदली झालेल्या अनेक डॉक्टरांच्या जागेवर इतर डॉक्टर रुजू न झाल्यामुळे डॉक्टरांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या रुग्णालयात साडेचारशे डॉक्टरांचा ताफा असून ही डॉक्टर मंडळी वाढत्या रुग्णसंखेवर उपचार करण्यासाठी कमी पडत आहे. परंतु गेल्या २४ तासांत मरण पावलेल्या २४ रुग्णांना औषध न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला. वेळेवर औषधी मिळत नाहीत, तसेच हायर अँटीबायोटिकचा पुरवठा खूप कमी असून महत्त्वाच्या औषधींना बगल दिली जात आहे.
शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे गोरगरीब असून त्यांना महागडी औषधी परवडत नाही. तसेच बाहेरून औषधी विकत घ्यायचे म्हटले तर अनेकदा रुग्ण व डॉक्टरांमध्ये वाद होतो. सद्यस्थितीला नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची परिस्थिती अतिशय गंभीर असून या ठिकाणी तत्काळ औषधींचा पुरवठा न झाल्यास आणखी किती जणांचा बळी जाईल हे सांगणे अवघड आहे, अशी चर्चा आहे.