महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील ७६७ शेतकरी आत्महत्या : स्थगन प्रस्ताव नाकारल्यावर विजय वडेट्टीवार यांचा आक्रमक पवित्रा, विरोधकांचा सभात्याग

मुंबई – राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, आणि शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातील प्राधान्यक्रम यावर कठोर प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या स्थगन प्रस्तावाला मंजुरी न दिल्यामुळे त्यांनी तीव्र निषेध नोंदवत विरोधी सदस्यांसह सभात्याग केला.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, 2025 च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी 194 प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. तरीही शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, “शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री आणि त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणारे माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतमालाला हमीभाव नाही, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. सरकारने दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच निवडणुकीआधी कर्जमाफी जाहीर केली होती. पण आता समितीकडे विषय सोपवला जात आहे. आम्हाला समिती नको, कृती हवी!”

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी 20 हजार कोटी मंजूर करण्यात आले असताना शेतकरी कर्जमाफीसाठी निधी का नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

लातूरमधील अंबादास पवार या वयोवृद्ध शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपल्याची हृदयद्रावक घटना सांगताना वडेट्टीवार भावुक झाले. ते म्हणाले, “ही वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर का आली? नांगराला बैल जुंपण्याचा खर्चही शेतकऱ्याला परवडत नाही.” यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नावर सर्व कामकाज थांबवून तातडीची चर्चा करण्याची जोरदार मागणी केली.

मात्र, सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे, वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि विरोधी पक्षातील सदस्यांसह सभात्याग केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात