मुंबई: मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या विविध मागण्या अखेर मान्य करण्यात आल्या आहेत. सोमवारी कामगार संघटनांबरोबर महापालिका प्रशासन करार करणार असून, त्यामुळे २३ जुलैपासून जाहीर केलेला संप मागे घेण्यात आला आहे. संघर्ष समितीने सोमवारी विजयी मेळाव्याचे आयोजन केल्याची घोषणा केली आहे.
महापालिकेतील सफाई कामगारांच्या एकही पदावर गदा येणार नाही, तसेच कंत्राटी सफाई कामगारांना कायम करण्यात येईल, असा ठोस निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सोमवारी महापालिका आयुक्त कामगार नेत्यांसोबत अधिकृत करार करतील.
आज सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी, मनपा कामगार संघर्ष समिती यांच्यात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत समाजवादी कामगार नेते साथी कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरेश ठाकूर, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, रमाकांत बने, वामन कविस्कर, मिलिंद रानडे, रंगा सातवसे, बाबा कदम, देवी गुजर, प्रकाश जाधव, शेषराव राठोड, प्रफुल्लता दळवी आदी उपस्थित होते.
१७ जुलै रोजी आझाद मैदानावर झालेल्या मनपा सफाई कामगारांच्या मोर्चाची आणि जाहीर संपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यांनी ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांना मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात पाठवले होते. त्यानंतर विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
या मागण्यांमध्ये टेंडर प्रक्रियेमुळे कामगारांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण होणार नाही, कंत्राटी कामगारांना कायम करणे, कामगारांची पदे सुरक्षित ठेवणे, लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आदींचा समावेश होता.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी याबाबतचा अधिकृत करार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोमवारचा विजयी मेळावा होणार असून प्रस्तावित संप मागे घेतल्याचे संघर्ष समितीचे समन्वयक वामन कविस्कर यांनी सांगितले.
गेल्या दशकातील सर्वात मोठा विजय
सफाई कामगारांचा हा गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया चारही प्रमुख कामगार नेते अशोक जाधव, रमाकांत बने, कॉ. मिलिंद रानडे आणि बाबा कदम यांनी दिली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि साथी कपिल पाटील यांचे विशेष आभार मानले.