नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त “आयुर्वेद व सौंदर्यशास्त्र” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक संशोधनाशी जोडण्याचे महत्व अधोरेखित केले.
त्या म्हणाल्या, “आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून एक जीवनशैली आहे. ऋषी-मुनींनी निसर्गाच्या अभ्यासातून हे ज्ञान प्राप्त केले. आजच्या युगात वैज्ञानिक संशोधनाशिवाय परंपरेवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळवण्यासाठी आधुनिक संशोधन मानकांशी जोडणे अत्यावश्यक आहे.”
कार्यक्रमात प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आयुर्वेद शारीरिक व मानसिक आरोग्याला समान महत्त्व देतो. आयुष विभागप्रमुख डॉ. गितांजली कार्ले यांनी स्पष्ट केले की, “आयुर्वेदाचा उद्देश केवळ रोगमुक्ती नसून निरोगी, दीर्घायुषी व आनंदी जीवन देणे हा आहे.” त्यांनी माहिती दिली की २०२५ पासून दरवर्षी २३ सप्टेंबर हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
पुण्याचे नामांकित वैद्य हरीश पाटणकर यांनी सौंदर्यशास्त्रावरील मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “रासायनिक उपचारांमुळे तात्पुरते सौंदर्य लाभते, पण त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ टिकतात. आयुर्वेदाने दिलेले सौंदर्यशास्त्र नैसर्गिक व चिरंतन आहे.”
कार्यक्रमाला वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, तसेच मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभारी अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मेगा बोरसे, श्रीमती शितल आभाळे, श्रीमती मीना सुर्यवंशी, सागर कुलकर्णी आणि लोकेश गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले.