मुंबई : पुण्यातील महार वतनाची तब्बल ४० एकर शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने कवडीमोल दराने भ्रष्ट मार्गाने हडपल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवावे, असे खुले आव्हान दिले.
सपकाळ म्हणाले, “सरकारच्या ताब्यातील वतनाची जमीन विकली गेली, हा गंभीर प्रकार आहे. अशा जमिनीचा व्यवहार झाला तरी कसा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा व्यवहार त्वरित रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी.”
पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून, तिने कोरेगाव पार्क परिसरातील जमीन अत्यंत अल्प दरात खरेदी केली आहे. या कंपनीचे भागभांडवल फक्त एक लाख रुपये आहे. इतक्या अल्प भांडवलाच्या कंपनीला ४८ तासांत उद्योग संचालनालयाकडून आयटी पार्कसाठी मंजुरी देण्यात आली. सरकारच्या मालकीची वतनाची जमीन खरेदी होऊ शकते का? आणि एवढ्या मोठ्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली? हे सरकारने स्पष्ट करावे,” असा सवाल सपकाळ यांनी केला.
सपकाळ यांनी टोला लगावत म्हटले, “शेतकरी कर्जमाफीच्या वेळी ‘सारखं मोफत कसं मागता, थोडं हातपाय हलवा’ असा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांच्या स्वतःच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना त्यांना वेदना का होतात? हे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’ या म्हणीचं ज्वलंत उदाहरण आहे. हा व्यवहार म्हणजे एक मोठा स्कॅम असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

