मुंबई – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ऐतिहासिक ठसा उमटवणारे लंडनमधील “इंडिया हाऊस” (India House in London) लवकरच महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी बुधवारी केली.
यापूर्वी राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे लंडनमधील निवासस्थान विकत घेतले होते. आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या वास्तव्याने पावन झालेले “इंडिया हाऊस” स्मारक म्हणून जतन करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी सांगितले.
शेलार यांनी सांगितले की, “मी लंडन दौऱ्यावर असताना रघूजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीसाठी गेलो होतो. त्यावेळी मी ‘इंडिया हाऊस’ला भेट दिली होती आणि तेथील भारतीय नागरिकांनी या वास्तूच्या जतनाची मागणी केली होती.”
हीच मागणी नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे (BJP MLA Devyani Farande)यांनीही केली होती. त्यामुळे शेलार यांनी त्यांच्या मंत्रालयात सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभाग, वित्त विभाग आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत सविस्तर बैठक घेतली.
या बैठकीत “मित्रा” यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली असून, ती समिती “इंडिया हाऊस” ताब्यात घेण्यासाठी सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

