महाराष्ट्र ताज्या बातम्या

टाळ्याही थांबल्या… श्वासही — ‘नली’ने प्रेक्षकांना अंतर्मुख करून सोडले’

मुंबई — प्रायोगिक रंगभूमीला नवी पहाट देण्याच्या ध्येयाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सुरू झालेल्या ‘नाट्य शुक्रवार’ या उपक्रमात आज एक विलक्षण प्रयोग रंगला — खानदेशातून, जळगावच्या परिवर्तन संस्थेने सादर केलेला एकपात्री दिर्घांक “नली”.

रंगमंचावर प्रकाश मंदावला आणि कथा संपली, पण प्रेक्षक सुन्न. हाऊस लाईट लागल्यानंतरही कुणाच्या हाताला टाळ्या दाद देण्याचे भान नव्हते. काही क्षणांनी भान परत आले… आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गडगडाटाने दुमदुमून गेले. असा दुर्मिळ अनुभव कोणाला रोज मिळतो?

श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारित, शंभू पाटील यांचे नाट्यरूपांतर आणि योगेश पाटील यांच्या दिग्दर्शनाचा “नली” हा नाट्यप्रयोग होता. पण या संहितेला आत्मा देणारे कलाकार होते — हर्षल पाटील. एकट्याने संपूर्ण कथा आपल्या खांद्यावर वाहत रंगमंचावर सजीव उभ्या करणाऱ्या या तरुण कलावंताने जणू काही प्रेक्षकांच्या हृदयात हात घालून भावना हलवल्या.

कथा साधी, पण दाहक.
खानदेशातील एका खेड्यातली नली — अभ्यासात मंद, हसण्यात पार तेजस्वी. तिच्या उपस्थितीत रानफुलाची मऊ, गंधाळ स्पर्शता.
बाल्या — हुशार, कष्टाळू, गावातून बाहेर पडून मोठा अधिकारी होणारा.
दोघांनाही प्रेम असतं… पण व्यक्त न केलेलं.
शब्द ओठापर्यंत येतात आणि वितळून जातात.
अंतर वाढत जातं.
आणि एक दिवस — कर्जबाजारीपणा, सावकारी दडपण, आणि नलीची आत्महत्या.

वृत्तपत्रातील छोट्या बातमीने बाळ्या ढासळतो.
प्रेक्षकही.

हर्षल पाटील एकट्याने या संपूर्ण भावविश्वाला ज्या ताकदीने उभं करतात, ते नाट्य शुक्रवारच्या उपक्रमाला एक वेगळी उंची देऊन जातात. गाव, शाळा, कुटुंब, आणि अनेक पात्रे—प्रत्येकाला वेगळी ओळख, वेगळं श्वास, वेगळी लय.

प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताने अनुभव आणखी प्रभावी झाला.

“नली” केवळ एक नाटक नाही, तर गावातील महिलेच्या नियतीचा आरसा आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात