नागपूर – “आपण पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य होतो… त्यामुळे शेतकऱ्यांप्रती भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,” अशी ठाम मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर करताना केली.
धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “चार दिवस विदर्भाचे मीठ खाल्ले… त्या मिठाला तरी जागा,” असा शालजोडीतला टोलाही त्यांनी सरकारला लागला.
मुनगंटीवार यांनी रेती कंत्राटे देण्याच्या पद्धतीवरही जोरदार हल्ला चढवला. “रेती कंत्राटे नागपूरमधील लोकांनाच का? कारण करप्शन मॅनेजमेंट आमच्याकडच्या लोकांना जमणार नाही… रात्रीत मान्यतेच्या तिप्पट रेती उचलता येणार नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला.
त्याचबरोबर त्यांनी सुचवले की, रेती बांधकामासाठी मोफत उपलब्ध करून द्या, ज्या प्रमाणात रेती लागेल, त्यावर स्वतंत्र ‘सेस’ लावा. “जनतेला सज्जन राहू द्या, चोर बनवू नका,” असा तीव्र शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले.
कृषी विभागात संगणक यंत्रांची खरेदी आणि अंमलबजावणी कासवगतीने का चालली आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारला विचारले की, “चिखलात राबणाऱ्या भात शेतकऱ्यांना चांगला संदेश द्या. विजय केळकर समितीच्या शिफारशी स्वीकारा.”
मुनगंटीवार म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्यात संशोधनासाठी आवश्यक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आजच घोषणा करा.” सभागृहातील चर्चेत त्यांच्या या मागण्यांनी सरकारवर दबाव वाढविला असून ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांना नव्याने अधोरेखित केले.

