नागपूर : राज्यात राबविण्यात येत असलेली वीज स्मार्ट मीटर योजना उपयुक्त ठरली असून, हे मीटर बसविण्यात आलेल्या 99 टक्के ग्राहकांचे वीजबिल वाढलेले नाही, असे अहवाल उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात दिली.
या योजनेंतर्गत ग्राहकांना प्रत्येक तासाचा वीज वापराचा तपशील (रिपोर्ट) उपलब्ध होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आ. राजेश मोरे यांनी हा मूळ प्रश्न उपस्थित केला होता. टोरेन्ट पॉवर लिमिटेड कंपनीकडून शेतकरी व नागरिकांकडून फक्त 100 युनिट वापर असूनही 1,000 युनिटचे देयक भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि या प्रकरणी कारवाईची मागणी केली.
यावर उत्तर देताना संबंधित राज्यमंत्री यांनी, “अशी सक्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी केली जाईल,” असे स्पष्ट केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी कोकणातील अनेक घरे दीर्घकाळ बंद असतात. अशा ठिकाणी महावितरणचे अधिकारी कुलपे तोडून स्मार्ट मीटर बसवत असल्याच्या तक्रारी असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले.
या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवू नयेत, असे स्पष्ट आदेश देण्यात येतील.”

