मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रासह ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागांसाठीही त्याच दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेचे विद्यमान सदस्य डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे.
या निवडणुकीची अधिसूचना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, ९ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.
मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

