मुंबई : मुंबई शहरातील धूळ आणि हवा प्रदूषणाची समस्या गंभीर बनली असून या प्रश्नाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना त्यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सरकारवर टीका केली.
मुंबईत सध्या धूळ आणि हवा प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनली असून वृद्ध आणि लहान मुलांना शंभर मीटर अंतरावरील वस्तूदेखील धुसर दिसते, अशी गंभीर परिस्थिती असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. अशा परिस्थितीत वातावरण शुद्ध राहावे यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असताना यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याचा आरोप त्यांनी केला.
“मुंबईकरांनी श्वास घ्यायचा की नाही?” असा सवाल करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. मुंबई महानगर असूनही शहरासाठी अर्थसंकल्पात ठोस योजना नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईत सर्वत्र सुरू असलेल्या खोदकामांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याचे त्यांनी सांगितले. फूटपाथवरून चालणे कठीण झाले असून काँक्रीटचे रस्तेही दोषपूर्ण असल्याने वारंवार उखडले जात असल्याची टीका त्यांनी केली.
मेट्रो सेवा सुरू झाली असली तरी प्रवाशांच्या सोयींकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. अंधेरी आणि बीकेसी येथील मेट्रो स्थानकांचे उदाहरण देत त्यांनी प्रवासी सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले.
मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत सरदेसाई म्हणाले की, आज मराठी माणसाला मुंबईत घर घेणेही कठीण झाले आहे. संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबांना त्यांच्या घरांचा ताबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
म्हाडाच्या ५६ वसाहतींवरील अतिरिक्त सेवाशुल्काचा मुद्दाही त्यांनी सभागृहात मांडला. ही रक्कम केवळ ३५० कोटी रुपये इतकी असून सरकारने त्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी मुंबईतील टँकर माफिया आणि मनपा अधिकाऱ्यांमधील साटेलोटे असल्याचा आरोपही केला. मुंबईकरांच्या हक्काचे पाणी टँकरद्वारे बाहेर विकले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

