मुंबई : अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी कोणत्याही प्रकारचा घातपात झाला असल्यास दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.
अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर भावनिक आणि ठाम भूमिका मांडली.
“अजितदादा पवार हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. गेल्या काही वर्षांत आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते,” असे सांगत त्यांनी या घटनेविषयी वैयक्तिक वेदना व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, अपघातानंतर एडीआर (Accidental Death Report) नोंदवला जातो आणि एडीआर व एफआयआर यामध्ये तांत्रिक फरक नसतो. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
मात्र, या घटनेवर कर्नाटकात झिरो एफआयआर नोंदवण्यात आल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत, “हे महाराष्ट्राची मानहानी करणारे आहे,” असे स्पष्ट केले.
शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले,
“ते तुमचे काका होते; पण येथे कोणाचीही भावना कमी नाही. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी केली जाईल.”
घातपाताचा संशय असल्यास कठोर कारवाईचा इशारा देताना त्यांनी स्पष्ट केले की,
“जर या अपघातामागे कुणाचा हात असेल, तर सत्य बाहेर काढण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.”
तसेच या संदर्भात प्राप्त झालेले पत्र केंद्र सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

