महाड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेची संकेतस्थळे दीर्घकाळापासून ठप्प असल्यामुळे महाड तालुक्यातील शेतकरी आणि लाभार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. संकेतस्थळ बंद असल्याने नवीन नोंदणी पूर्णपणे ठप्प झाली असून, शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत लघु शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संकेतस्थळ सतत बंद असल्याने ई-केवायसी, नोंदणी आणि दुरुस्ती यांसारखी कामे रखडली आहेत.
याशिवाय, ओटीपी पद्धतीऐवजी अंगठा प्रमाणीकरण (बायोमेट्रिक) प्रणाली लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयात जावे लागते. इंटरनेट अडचणी आणि मर्यादित सुविधा यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचे संकेतस्थळ देखील गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत २,८७१ घरकुल मंजूर असून, त्यापैकी ३०५ पूर्ण तर १७८ घरकुल पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. मात्र संकेतस्थळ बंद असल्यामुळे या प्रकल्पांनाही अडथळे येत आहेत.
नवीन लाभार्थ्यांना नोंदणी करता येत नसल्यामुळे अनेकजण प्रतीक्षेत असून, शासनाने तातडीने संकेतस्थळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

