Twitter : @NalavadeAnant
मुंबई
नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे. मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण करत आहेत. मी खोटं कधी बोलत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे काम कुणाचा बापही आला तरी करु शकत नाही, असा ठाम दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar says nobody will separate Mumbai from Maharashtra) यांनी शुक्रवारी येथे महाराष्ट्रातील जनतेला दिला.
वरळी येथे महायुतीची सभा आज मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत पवार यांनी विरोधकांना जोरदार खडे बोलही सुनावले.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काम करत आहोत. त्यामुळे आता झालं गेलं विसरून नवीन पहाट बघून काम करायचे आहे, असा विश्वासही पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे. योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. थांबलेली कामे वेगवान पध्दतीने व्हावी यादृष्टीने सरकारने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक संकटांचा (Natural calamity) सामना महाराष्ट्राने पाहिला आहे. संकट आल्यावर न डगमगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) विचाराने पुढे जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे हात बळकट करायचे आहेत. मागे काय झालं हे उकरत न बसता चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जागा निवडून आणावयाच्या आहेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
ते म्हणाले, जाणीवपूर्वक आमच्याबद्दल काही बातम्या पसरवल्या जात आहेत. मी, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस लोकांचे हित लक्षात घेऊन सरकारमध्ये काम करत आहोत, असेही पवार यांनी माध्यमात उलटसुलट येणाऱ्या बातम्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
येत्या वर्षभरात पूर्ण होणाऱ्या प्रकल्पावर सरकारचा जास्त लक्ष घालण्याचा निर्णय झाला आहे. सर्वसामान्य लोकांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतानाच त्यांची काळजी घेत आहोत. महामानवांच्या विचारावर आमची वाटचाल सुरू आहे. सर्वांच्या विचाराने महायुतीत आम्ही सहभागी झालो आहोत असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.
आजच्या महायुतीच्या सभेतील ‘मिशन ४८’ चा संकल्प पूर्ण करुया. तन-मन-धन लावून काम करा, असे आवाहन करतानाच महाराष्ट्राच्या भल्याकरता उत्तम पध्दतीने काम करुया असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.