Twitter : @NalavadeAnant
मुंबई
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. फक्तं जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या घटनेनंतर तात्काळ प्रसार माध्यमांशी बोलताना केले.
यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या घटनेची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. मी या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाहीही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली होती. मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. मात्र आज जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक त्यांना भेटायला गेले. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली होती, अशी सारवासारवही त्यांनी यावेळी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची असून समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामूळे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी बोलताना केला.