Twitter : @therajkaran
पुणे
शेतकरी आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ज्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याविषयी आजवर बोलले जात होते, त्यांनाच हा देश म्हणजे आयतं खाणाऱ्या 80 कोटी लोकांचा देश वाटू लागला आहे, माणसे भिकारी बनवण्याचं काम सुरू आहे, असे विधान करून एका अर्थी आपली तत्त्व आणि गरिबी ही पूर्ण विसरून आता ते ‘ आहे रे ‘ नावाच्या गटामध्ये सामील झाले आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत (AAP Spokesperson Mukund Kirdat) यांनी केली आहे.
देशातील 80 कोटी जनता ऐतखाऊ असून रेशन व्यवस्था बंद करा असे टोकाचे विधान सदभाऊ खोत यांनी केले आहे. त्याचा समाचार घेताना आप प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले की, सदाभाऊ खोत हे अतीश्रीमंतांची नवीन विचारसरणी घेऊन भाजपच्या (BJP) छुप्या धोरणासाठी काम करीत असावेत असे दिसते. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांचा (farmers suicide) कलंक आहे. अशा स्थितीत शेतकरी स्वतःच पिकवलेलं खाऊ शकत नाही, अशी स्थिती असताना स्वतःला शेतकरी म्हणून घेणारे हे नेते हेच एका अर्थाने कलंक आहेत, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
आर्थिक दुर्बलांना किमान दोन वेळच्या जेवणाचा, जगण्याचा संविधानिक अधिकार म्हणून हे धान्य दिले जाते. मोफत रेशन व्यवस्था ही किती महत्त्वाची आहे हे आपण कोरोना (corona pandemic) आणि नंतरच्या अतिवृष्टी (Heavy rain), दुष्काळी परिस्थितीमध्ये (drought) नेहमीच पाहत आलो आहोत. त्यामुळे सदाभाऊंनी पुन्हा एकदा थांबून स्वतःच्याच भूतकाळाकडे पहावे, असा सल्ला मुकुंद किर्दत यांनी दिला आहे.