शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरी मदत मिळणार
X: @therajkaran
नागपूर: नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली जायची. मात्र महायुती सरकारने तीन हेक्टरी मदत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
अल्पकालीन चर्चेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज फार मोठा दिलासा दिला आहे. खरीपाचा दुष्काळ असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा गारपीट असेल या सर्व बाबी लक्षात घेता या राज्यातील शेतकरी महाभयंकर संकटात होता मग तो कापूस, सोयाबीन, धान, द्राक्ष उत्पादक असेल किंवा बहुपीक घेणारा शेतकरी असेल यांच्यासाठी आज महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे राज्याचा कृषीमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी आभार मानले.
आज मोठी घोषणा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, जिरायती शेतीमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते, कापसाचे पीक घेतले जाते, याशिवाय आंतरपीक म्हणून मूग, तूर, उडीद ही पिके घेतली जातात. या सर्वांना प्रचलित दोन हेक्टरच्यावर एक हेक्टरची वाढ करत जास्तीची १३ हजार सहाशे प्रतिहेक्टरी मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बागायती शेतीसाठी अतिवृष्टीमध्ये किंवा गारपीठीने जे नुकसान झाले अशा बागायतदार क्षेत्रामधील शेतकऱ्यांना २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार प्रतिहेक्टरी मदतीची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.
आजचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारमधील हा ऐतिहासिक निर्णय असून या निर्णयाचे अभिनंदन आणि शेतकऱ्यांच्या वतीने धनंजय मुंडे यांनी आभार मानले.