नागपूर
सोयाबीन-कापसाला भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवनावर मोर्चा पुकारला आहे. विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर जवळ उभे राहून त्यांनी ताफ्यासह आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तेथे पोलिसांकडून अडवण्यात आलं. सह्याद्रीवर पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नसल्याचा आरोप तुपकरांनी यावेळी केला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रासाठी पनौती आहेत, असा हल्लाबोल तुपकरांनी मुख्यमंत्र्यावर केला. कापूर आणि सोयाबीन या दोन्ही पिकांच्या दरात घट झाली असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. नुकसानभरपाई आणि पीक विम्याचे पैसे तत्काळ जमा करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
तुपकरांनी गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) सोबायीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी चार दिवस अन्नत्याग करीत आंदोलन पुकारलं होतं. यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते वारंवार राज्य सरकारसोबत बैठका घेत आहेत. मात्र अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.