मुंबई
मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा आज आंतरवली सराटीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी केली आहे.
सोशल मीडियावर माझ्याविरोधात बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून सुपारी घेतली आहे, असा दावा पाटील यांनी केला आहे. आंदोलनातून काय मिळालं, असं सोशल मीडियातून विचारलं जात आहे. पण हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी-विरोधी पक्षातील लोक जाणून-बुजून बोलत आहेत. मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे, असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. ७० ते ७५ वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत. त्यांना असं वाटत आहे त्यांची दुकाने बंद झाली. त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
पुन्हा पुन्हा उपोषण नको..
मनोज जरांगे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला. त्यामुळे सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाच्या मुद्यावर निश्चितच पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणी आगामी अधिवेशनात निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिल्यामु्ळे आता जरांगे यांनी पुन्हा पुन्हा उपोषण करण्याची भूमिका घेऊ नये, असं शंभूराज देसाई म्हणाले.