X: @therajkaran
मुंबई: मराठी भाषा आज देशभरात अनेक प्रदेशात आजही बोलली जाते. ती जतन करण्याचे मोठे काम महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठी संस्थांनांमुळे झाले. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या पिढीला या संस्थानांचा इतिहास कळावा यासाठी त्यासंबंधी पुस्तके प्रकाशित व्हावीत, अशा सुचना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे इंदूर, शिंदे यांचे ग्वाल्हेर, धारचे पवार, गायकवाड यांचे बडोदा, सरफोजीराजे भोसले यांचे तंजावर या संस्थांनांनी विशेषतः महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा जतन करण्याचे मोठे काम केले. त्या भागात आजही मराठी भाषा बोलली जाते. भावी पिढीला याविषयीची माहिती व्हावी, यासाठी या राजघराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे केसरकर म्हणाले.
शालेय शिक्षणमंत्री म्हणाले, दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये भारतीय संस्कृतीचा झालेला प्रसार यासंबंधीही पुस्तके प्रकाशित व्हावीत, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. उत्कृष्ट अशा १०० साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहितीही या वेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिली.
Also Read: माजी मंत्री रोहिदास पाटील यांची प्रकृती बिघडली; कोल्हापूरात उपचार सुरु