मुंबई: महाराष्ट्रात सर्वत्र सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. विदर्भातील सोयाबीन पाण्याखाली गेले, कापूस अडचणीत आला आहे, संत्रा-मोसंबी गळती सुरू झाली आहे, तर कांदा पीक संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहे. पुण्यातील सुमारे ५५ महसूल मंडळांसह सोलापूर, बीड, भंडारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे.
आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने ३० मे २०२५ च्या शासन आदेशानुसार केवळ दोन हेक्टर शेतीपुरती मदत जाहीर केली आहे. त्यात कोरडवाहू क्षेत्रासाठी फक्त ८५०० रुपये प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी १७ हजार रुपये प्रति हेक्टर इतकीच नुकसानभरपाई आहे. “ही रक्कम अत्यल्प असून शेतकरी उभा राहणे शक्य नाही. महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत असताना तातडीने पंचनामे करून मदत करणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
किर्दत यांनी पुढे सांगितले की, “पंजाबात पूरस्थितीत आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना तब्बल ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. देशातील सर्वाधिक नुकसानभरपाई देणारे एकमेव सरकार म्हणजे पंजाब सरकार आहे. विरोधी पक्षात असताना अनेक पक्ष मागणी करतात, पण प्रत्यक्षात ती अंमलात आणून दाखवणारे फक्त आम आदमी पार्टी आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्याच धर्तीवर नुकसानभरपाई द्यावी.”
यासोबतच मोदी सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या कपाशीवरील ११% आयात कर काढून टाकल्याने ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना जाहीर हमीभावापेक्षा तब्बल दीड हजार रुपये कमी मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राज्यातील विविध ठिकाणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा किर्दत यांनी दिला.