X : @therajkaran
मुंबई – हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत (NEET exam) पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? ६७ मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? ‘नीट’ ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (Maharashtra Navniraman Vidyarthi Sena) अध्यक्ष अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही परीक्षा आवश्यक आहे. विद्यार्थी यासाठी मान लावून अभ्यास करतात, मात्र निकालात गोंधळ झाला, गडबड झाली तर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागते. यंदाच्या नीट च्या निकालात गोंधळ झाल्याने संतप्त झालेले अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी खरमरीत पत्र लिहिले आहे. ते म्हणतात, नीट च्या निकालात परीक्षेत गडबड, विद्यार्थी-पालकांमध्ये अविश्वास, डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप, आंदोलने… हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलने सुरू आहेत, हे बरे नव्हे!
पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. ‘नीट’ परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारने तात्काळ या गंभीर परिस्थितीचा तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पालक आणि विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणाच्या गरिमेशी खेळ करणं, हे कदापिही सहन केलं जाणार नाही!, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.