नागपूर – अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदत प्रस्ताव कधी पाठवला, त्याची तारीख जाहीर करा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली.
आज 9.45 वाजता शेतकरी समस्यांवरील विशेष चर्चेत ते सरकारवर जोरदार तुटून पडले.
जाधव म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकऱ्याला तातडीने मदत हवी आहे. पण केंद्रीय पथक रातोरात येते आणि रातोरात निघून जाते. बिहार निवडणुकांमध्ये कोणतीही आपत्ती नसताना दहा-दहा हजार रुपये पाठवले; मग महाराष्ट्राकडे दुर्लक्ष का?, इतकी महत्त्वाची चर्चा असूनही मदत-पुनर्वसन खात्याचे मंत्री सोडून एकही मंत्री सभागृहात नाही. अदृश्य गॅलरीतील अधिकारीही अदृश्यच आहेत.”
जाधव पुढे म्हणाले, “सरकार म्हणते ३२ हजार कोटींचे पॅकेज. पण ते कसे वितरित करणार, याची माहिती नाही. महागाई वाढते आहे, शेतकरी खचला आहे. तुमचे बजेट फसले आहे. वारंवार पुरवणी मागण्या करता. गोळाबेरीज म्हणजे पॅकेज नसते.”
कोकणातील शेतीच्या समस्यांवर बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “हापूस आंब्याचे मानांकन गुजरातच्या बलसाड आंब्याला देणे म्हणजे अन्याय आहे. त्या आंब्याला ‘हापूस’ हा शब्द लागूच नये; हापूस हा कोकणचा अभिमान आहे.”
चर्चेची सुरुवात सत्तारूढ पक्षाचे रणधीर सावरकर यांनी केली. त्यांनीही सरकारला काही कठोर सूचना केल्या. “सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती एकच — हे सरकारने स्पष्ट जाहीर करावे. कृषी विद्यापीठांमध्ये राजकीय बदल्यांचे अधिकारी पाठवू नका; बुद्धिमान अधिकारी पाठवा. महाराष्ट्र रिसर्च मिशन रद्द करा; कृषी विद्यापीठांना सशक्त करा. कृषीमंत्र्यांनी यासंदर्भात विशेष बैठक घ्यावी.”

