मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, भाजपाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध आणि काटेकोर पद्धतीने काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी वॉर्डनिहाय आढाव्यासाठी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
या नेमणुकीनुसार संबंधित पदाधिकाऱ्यांनी 7 जुलै 2025 पर्यंत आपापल्या भागातील सविस्तर अहवाल भाजप मुंबई कार्यालयात सादर करणे अनिवार्य राहील.
जिल्हानिहाय जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत: उत्तर मुंबई – आमदार अतुल भातखळकर आणि योगेश सागर. उत्तर पश्चिम मुंबई – आमदार अमित साटम आणि आमदार विद्या ठाकूर. उत्तर पूर्व मुंबई – आमदार मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक. उत्तर मध्य मुंबई – आमदार पराग अळवणी आणि आमदार संजय उपाध्याय. दक्षिण मध्य मुंबई – आमदार प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनील राणे. दक्षिण मुंबई – मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
दरम्यान, आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या संचलन समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. एकूण 27 सदस्यांच्या या समितीत मुंबईतील सध्याचे व माजी आमदार, माजी नगरसेवक तसेच महिला मोर्चा व युवा मोर्च्याचे अध्यक्ष यांचा समावेश आहे, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली.