मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत केला. प्रचंड बहुमताच्या जोरावर सरकार मस्तीत असून विरोधी पक्षांबाबत सत्ताधाऱ्यांचे वर्तन असभ्य आहे, असा घणाघाती आरोप करत महाविकास आघाडीने सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नाही, शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नाही, राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे, सौरऊर्जा प्रकरणात १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, महिलां-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे आणि बेरोजगारी भयावह पातळीवर पोहोचली आहे, अशी गंभीर टीका यावेळी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शिवालय येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिलेल्या चहापान कार्यक्रमावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमिन पटेल यांनी बहिष्कार टाकला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते मात्र या पत्रकार परिषदेला पोहोचू शकले नाहीत.
यावेळी बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक कमी लेखले जात असल्याचा आरोप केला. राज्यातील एकही जिल्हा सुजलाम-सुफलाम नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. सतेज पाटील यांनी राज्यात सुमारे ७० लाख बेरोजगार असल्याचा दावा केला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या धाडीबाबत मंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दावोस येथे झालेल्या करारांबाबत श्वेतपत्रिका सभागृहात मांडण्याची घोषणा केली.
पत्रकारांनी मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलेल्या ‘क्लीन चिट’ आणि समिती अहवालाबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी, आधी समितीचा अहवाल सादर होऊ द्यावा, त्यानंतरच भूमिका स्पष्ट करता येईल, असे सांगितले.
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची पूर्णपणे धिंडवडे निघाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. तर सतेज पाटील यांनी मंत्रालयातील एखाद्या मंत्री दालनावर एसीबीची धाड मुख्यमंत्री यांच्या माहितीसिवाय शक्य नाही, असे प्रतिपादन केले. मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाची कोंडी करण्यासाठीच ही कारवाई झाली का, असा खोचक सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

