मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. यासोबतच, या हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की,राज्य सरकार मृतांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधींकडे विशेष लक्ष देईल.विशेषत: ज्या कुटुंबांमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय त्यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला.यापूर्वीच, हल्ल्यातील मृतांपैकी एक असलेल्या जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच केली होती.आता या निर्णयामुळे दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.