माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई – राज्यात ० ते ५ वयोगटातील आधार नोंदणी वाढवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज मोठी घोषणा केली. या वयोगटातील सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या आधार सेंटरला ₹१ लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
राज्यात आधार नोंदणीचा आढावा
• १२.८ कोटी नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण
• ५ ते १८ वयोगटातील १००% नोंदणी पूर्ण
• ० ते ५ वयोगटातील नोंदणी सध्या ३९%
आधार नोंदणी केंद्रांना नवीन संचांचे वाटप
आज सह्याद्री अतिथीगृहात आधार नोंदणी केंद्रांसाठी नवीन संच वितरणाचा शुभारंभ मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नौनोटीया, संचालक अनिल भंडारी, उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र शिक्षरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई, ठाणे, पालघर विभागातील आधार नोंदणी केंद्रांच्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात नवीन संच वाटप करण्यात आले. यावेळी पराग जैन यांनी आधार नोंदणी प्रक्रियेत बांगलादेशी घुसखोरी होऊ नये याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
आधार नोंदणी केंद्रांसाठी नवीन पावले:
• ० ते ५ वयोगटातील आधार नोंदणी वाढवण्यासाठी स्पर्धात्मक योजना
• राज्यातील आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचार
• आधार नोंदणी केंद्र चालकांच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत सकारात्मक विचार
सेवा केंद्राची पावित्र्य जपा – मंत्री शेलार
आधार नोंदणी केंद्र ही सेवा केंद्रे असून, ती मंदिरासारखी पवित्र मानावी, अशी भावना मंत्री शेलार यांनी व्यक्त केली. अनावधानाने कोणतीही चूक झाल्यास देशासाठी घातक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशभरात मतदान आणि आधार लिंक करण्यावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र राज्य ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार घेत आहे. डिजिटल सुविधा नागरिकांचा हक्क असून, ही सेवा देणारे जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही मंत्री शेलार यांनी केले.