महाराष्ट्र ताज्या बातम्या

Death in MLA Hostel : मुंबईत आमदार निवासात कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू

वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू; आमदार विजय देशमुख यांची चौकशीची मागणी

मुंबई : पुण्यातील एका रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांतच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील आमदार निवासात घडली आहे. सोलापूरचे भाजप आमदार आणि माजी मंत्री विजय देशमुख यांचे कार्यकर्ता विशाल धोत्रे यांचे वडील मंगळवारी आमदार निवासातच वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशाल धोत्रे हे आपल्या वडिलांसह एका बैठकीसाठी आमदार विजय देशमुख यांच्यासोबत मुंबईत आले होते. काही कामानिमित्त विशाल मंत्रालयात गेले असताना, त्यांच्या वडिलांची आमदार निवासातील खोलीतच प्रकृती अचानक खालावली. तातडीने रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली, मात्र ती वेळेत उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आमदार विजय देशमुख व इतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. आमदार देशमुख यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर हा जीव वाचू शकला असता,” असे सांगितले. तसेच त्यांनी याप्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्यांनी सांगितले की, रुग्णवाहिकेसाठी अनेक वेळा फोन केले गेले, परंतु कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

आमदार निवासातील ही पहिलीच समस्या नाही. यापूर्वीही लिफ्ट बंद पडणे, छत कोसळणे यांसारख्या घटना येथे घडल्या आहेत. आता एका जीवावर बेतलेल्या घटनेमुळे प्रशासनाच्या दायित्व व सुविधा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात