मुंबई – “राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी नातेवाईक—बायको, बहिण, दीर, मामेभाऊ, मुलगा—यांना बिनविरोध जिंकण्यासाठी दबाव टाकत आहेत. काही ठिकाणी गुलाल उधळून विजय साजरा झाला, पण लोकशाही मात्र पायदळी तुडवली गेली,” असा थेट आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेच्या बळावर संपूर्ण यंत्रणा वापरली जात आहे. “कुठे पैशाचे प्रलोभन, तर कुठे पोलिसांचा दबाव — अशा पद्धतीने निवडणुका बिनविरोध केल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात जिथे निवडणुका होतील, त्या पारदर्शक होतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “एक ठिकाणी प्रचार करताना भाजपच्या महिला उमेदवाराने थेट सांगितले—मतदान करा नाहीतर निधी मिळणार नाही, विकास होणार नाही. मुख्यमंत्री भाजपचे असल्याने पदाधिकाऱ्यांना अधिक जोर चढला आहे. पण यावर आता जनता निर्णय देईल.”
कंत्राटदारांनी कामबंदी पुन्हा पेटवली
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी पुन्हा एकदा कामबंद आंदोलन केल्याचे चित्र दिसते आहे. यावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, “सरकारकडे शेतकऱ्यांना पैसे नाहीत. कंत्राटदारांची एक लाख कोटींची थकलेली बिलं सरकार देत नाही. पण निवडणुका आल्या की अचानक आमदारांना निधी वाटण्यात सरकार सक्षम होते. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे, पण सरकारची अकलेची दिवाळखोरी अधिक गंभीर आहे.”
“सर्व्हे म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग”
वडेट्टीवार यांनी भाजपच्या ‘सर्वे राजकारणा’वरही टीका केली. “निवडणुका आल्या की भाजपचे सर्व्हे येतात, बहुमत येणार अशा बातम्या येतात. सर्व्हे भाजप करतो आणि बातम्या भाजपच पसरवतो—हा लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मुंबईत मतदार ओळखीचे प्रकार समोर येत आहेत. जसे महाराष्ट्र–बिहारमध्ये झाले तसेच येथेही करण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र निवडणुका बॅलेटवर झाल्या तर खरे जनमत स्पष्ट होईल—दूध का दूध, पाणी का पाणी होईल.”

