मुंबई– बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारच्या ‘पीएम गतिशक्ती’ योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. ‘नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या ८९व्या बैठकीत’ हा निर्णय झाला असून, यामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढती प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांसह मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार!”
या ३२.४६० किमी लांबीच्या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत या महत्त्वाच्या स्थानकांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. औद्योगिक मालवाहतूकही अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे.
हा प्रकल्प ‘पीएम गतिशक्ती – राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ (पीएमजीएस-एनएमपी) च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध भागांमधील जोडणी वाढेल, वाहतुकीची कार्यक्षमता सुधारेल आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.
या निर्णयामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि प्रवाशांना तसेच उद्योगांना मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.