मुंबई – “बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही,” या एकाच ठाम आणि सडेतोड वाक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या टोलेबाज भाषणाला प्रत्युत्तर दिलं. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावत, संपूर्ण राजकीय चर्चेला एका वाक्यात पूर्णविराम दिला.
काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीवर अप्रत्यक्ष टीका केली होती. “मराठी माणसाची एकजूट होऊ नये म्हणून काहींच्या मालकांचे नोकर गाठीभेटी घेत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
या पार्श्वभूमीवर आज जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे क्रांतिकारी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक खाज्याजी नाईक यांच्या स्मारक व संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्या टीकेबद्दल विचारलं. यावर उत्तर देताना त्यांनी कोणतीही थेट टीका न करता, “बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही,” असं म्हणत मुद्द्याला सडेतोड उत्तर दिलं. याच वाक्याचा त्यांनी दोनदा पुनरुच्चार केला आणि चर्चा तिथेच थांबवली.
यावेळी बोलताना त्यांनी आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची आठवण करून दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात आदिवासी वीरांच्या गौरवासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनापासून ते उद्घाटनापर्यंतची जबाबदारी मला मिळणं, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे गट यांच्यातील हे वाकयुद्ध आगामी मुंबई महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक शब्द carefully मोजून वापरणाऱ्या फडणवीसांचा हा टोला सध्या उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर मानला जात आहे.