वाळूधोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार
नागपूर : घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, या निर्णयाचा थेट लाभ घरकुल बांधणाऱ्या लाखो कुटुंबांना मिळणार आहे.
राज्य सरकार आगामी आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. जनतेकडून आलेल्या सूचनांचा समावेश करत, अधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत आठ बैठका पार पडल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत, तसेच पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेली आहे, तेथे घाट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्य सरकार लवकरच ‘एम-सॅन्ड’ (Manufactured Sand) योजना आणणार आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून पर्यायी वाळू तयार केली जाणार आहे.
बावनकुळे म्हणाले की, या योजनेमुळे पारंपरिक नदीतील वाळूवरील अवलंबित्व कमी होणार असून, पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होईल.