चौकशीची सूत्रे अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या ताब्यात
Twitter: @NalawadeAnant
मुंबई: जालन्यातील अंतरवाली सराटी गावात घडलेल्या घटने संदर्भात महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडल्याचे उघडकीस आले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन लाठीचार्जच्या किमान तीन दिवस आधीपासून सुरू होते. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात त्याचे लोन पसरू शकते याची पुसटशी कल्पना देखील गुप्तचर यंत्रणेला लागू नये ही नामुष्कीची मानली जात आहे.
जालन्यात अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा आरक्षणाची आंदोलन राज्यभर पसरले. याचा फायदा उठवत विरोधी पक्ष देखील जालन्यात पोहोचून मराठा समाजाबद्दल आपल्याला असलेली सहानुभूती दाखवू लागला आहे. त्यामुळेच आता राज्यभर आंदोलनाचे पेव फुटले आहे. जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर ज्या प्रकारे लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला त्या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला अन् पेटून उठला.
या सगळ्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अशातच राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना जालन्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचीही सविस्तर माहिती घेऊन अतिरिक्त पोलीस महासंचालक स्वतः चौकशी करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच यात दखल घेत आदेश दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा विरोधक घेणार आहेत याची महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाला पुसटशीही कल्पना का आली नाही ? राज्यात, समाजात काय घडत आहे किंवा काय चर्चा सुरू आहे याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांमध्ये राज्य गुप्तचर विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये साध्या कपड्यातील पोलीस समाजामध्ये ठिकठिकाणी फिरून माहिती घेत असतात. परंतु मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाची व्याप्ती किती वाढू शकते याबद्दल राज्य गुप्तचर विभाग कुठेतरी फेल झाल्याचे दिसून येत असून आगामी काळात त्याचे मोठे पडसाद राज्य सरकारवरही पडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.