मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून त्यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर झालेल्या परिणामांकडे सरकारचे लक्ष वेधले.
जयंतराव पाटील म्हणाले की, अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या मालावर बंदी घालण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी सात–आठ महिन्यांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. चीनमधून अफगाणिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या मालावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला आहे. कोल्ड स्टोरेज पूर्ण भरले असून द्राक्षांची वाहतूक अडथळ्यांत आली आहे. त्यामुळे कोल्ड स्टोरेज तसेच कंटेनर कूलिंगचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून विशेष अनुदान दिले जाणार का, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.

