महाड : महाड-विन्हेरे मार्गावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एक १३ वर्षीय मुलगा जागीच ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघाताचे कारण राज्य मार्गावर पडलेल्या अवकाळी पावसामुळे झालेला चिखल असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांना गंभीर स्थितीत मुंबईला हलवण्यात आले आहे.
अपघाताची सविस्तर माहिती अशी आहे की, महाडहून विन्हेरे गावाकडे जाणाऱ्या MH-06-S-3625 या विक्रम रिक्षाचा चालक सुधीर गंगाराम गीजे हा रिक्षा घेऊन जात असताना, दुपारी ४ च्या सुमारास बिजघर गावाजवळ दापोलीकडून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा थेट रस्त्याच्या बाजूच्या गटारात जाऊन उभी राहिली.
या अपघातात मंथन रवींद्र भिलारे (वय १३, रा. शिरवली) या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे: राजेंद्र सखाराम भिलारे (३५, रा. शिरवली), अर्चना रुपेश धोत्रे (२७, रा. महाड), रियांश अभिषेक रेडीज (७, रा. दहिसर, मुंबई), श्रद्धा श्रीकांत मापुसकर (६०, रा. विन्हेरे), सुधीर गंगाराम गीजे (३९, रा. विन्हेरे) – रिक्षा चालक, श्रीकांत विठोबा मापुसकर (६५, रा. विन्हेरे), श्रेयशी अभिषेक रेडीज (३७, रा. विन्हेरे) आणि मंथन रवींद्र भिलारे (१३, रा. शिरवली) – मृत
अपघातानंतर टेम्पो चालकाने वाहन जागेवरच सोडून पळ काढला असून, महाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.