Twitter : @NalavadeAnant
मुंबई
आता आम्ही सत्तेत तीन भागीदार झालो आहोत. बरे झाले राष्ट्रवादी सोबत आली, यामुळे आता आम्ही ५० खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो आहोत. सध्या आम्ही एकत्र आहोत. मात्र पुढे काय होईल सांगता येत नाही, असे राजकीय अनिश्चितता वर्तविणारे विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी नंदुरबार येथे खाजगीत बोलताना केले.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिरात नंदुरबार तालुका विधायक समिती शिक्षण संस्था, बाजार समिती आणि विविध संस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, डॉक्टर तीन वेळच्या गोळ्या देतो, याप्रमाणे सध्या सकाळ, दुपार, संध्याकाळ असे शपथविधी झाले आहेत. आता आम्ही तीन जण सत्तेत भागिदार आहोत. भविष्यात राजकीय परिस्थिती कोणते वळण घेईल, हे सांगता येत नाही. मात्र, सध्या राज्याच्या विकासासाठी तिन्ही पक्ष मिळून राज्याचे हीत साधण्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाहून मिश्किलपणे गुलाबराव पाटील म्हणाले, बरे झाले, राष्ट्रवादी आमच्या सोबत आली, त्यामुळे तर आमचे ५० खोके आरोप बंद झाले, असे सांगताच एकच हास्यकाकोळ माजला होता. राष्ट्रवादीत सध्या काय सुरु आहे, हे ही समजायला मार्ग नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.