मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई: ब्रेकिंग न्यूजच्या धावपळीत सातत्याने काम करणाऱ्या पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या आरोग्यसुरक्षेसाठी मुंबईत स्वतंत्र अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील ‘आरबीजी फाउंडेशन’ आणि ‘टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन’ (TVJA) यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी विधान भवन परिसरात पार पडले.
या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले, आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, सदस्य मनश्री पाठक तसेच पंकज दळवी, मनाली गायकवाड, राजेश साफळे, अनिल सौंदडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचीही साथ लाभली आहे.
राज्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेग आल्याने पत्रकारांना संवेदनशील ठिकाणी धाव घ्यावी लागते. सततच्या धावपळीमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रारंभी दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून पुढील टप्प्यात पत्रकारांसाठी ‘हेल्थ कार्ड’ योजना राबविण्याचे नियोजन आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पत्रकार अनेकदा संवेदनशील घटनास्थळी कव्हरेज करतात. अशा वेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर सेवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे.”
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पत्रकारांसाठी अॅम्ब्युलन्स सेवा सुरू झाली आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र अशी वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा.”
आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांनी सांगितले की, “पत्रकारांच्या आरोग्यसुरक्षेला प्राधान्य देत ही संकल्पना साकारली आहे. पुढेही ‘टीव्हीजेए’च्या उपक्रमांना सहकार्य राहील.”

