महाराष्ट्र ताज्या बातम्या

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेची नवी प्रभाग रचना; माजी नगरसेवकांसमोर राजकीय आव्हाने वाढली

By: (प्रतिक यादव)

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेने नुकतीच जाहीर केलेली नवीन प्रभाग रचना माजी नगरसेवकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. आतापर्यंत 111 वार्डांचा समावेश असलेल्या या महानगरपालिकेत आता केवळ 28 प्रभाग तयार करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात चार वार्डांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी 27 प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग तीन सदस्यीय ठेवण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून वारंवार बदललेल्या प्रभाग रचनांनी स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे. 1992 मध्ये स्थापन झालेल्या या पालिकेच्या सुरुवातीच्या निवडणुकीत मर्यादित वार्ड होते. नंतर लोकसंख्या वाढ आणि शहराचा विस्तार लक्षात घेऊन वेळोवेळी प्रभागांचे फेरबदल करण्यात आले. 2015 मध्ये झालेल्या शेवटच्या निवडणुकीत 111 वार्ड होते. आता मात्र 2025 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल करण्यात आला आहे.

या नव्या रचनेमुळे अनेक माजी नगरसेवकांचे पारंपरिक राजकीय गणित उद्ध्वस्त झाले आहे. ज्या वार्डांमध्ये त्यांनी दीर्घकाळ वर्चस्व राखले, तिथले सीमांकन बदलून त्यात नवे वार्ड जोडले गेल्याने परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. उदाहरणार्थ, ठाणे-बेलापूर मार्गावरील औद्योगिक क्षेत्राशी जोडलेल्या काही प्रभागांमध्ये रहिवासी वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे, तर वाशी-कोपरखैरणे प्रभागांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण अधिक झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होणार आहे.

जानेवारीनंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर प्रत्येक माजी नगरसेवकाला केवळ आपल्या जुन्या वार्डापुरता मर्यादित न राहता नव्याने जोडलेल्या तीन वार्डांतही मोहीम राबवावी लागणार आहे. यासाठी नव्या भागात कार्यकर्ते उभे करणे, जनसंपर्क साधणे आणि स्थानिक प्रश्नांवर भूमिका मांडणे हे आव्हान ठरणार आहे. विशेषत: जे नगरसेवक फक्त एका बालेकिल्ल्यावर विसंबून होते, त्यांच्यासाठी ही रचना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

या बदलामुळे राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होणार असून, काही ठिकाणी अनपेक्षित लढती रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उद्धव), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) या सर्वच पक्षांसाठी उमेदवार निवडणे डोकेदुखी ठरणार आहे. अनेक ठिकाणी बंडखोरीही होण्याची शक्यता वर्तवली जाते.

प्रभाग रचनेमुळे मतदारसंख्येत झालेल्या बदलामुळे स्थानिक प्रश्नांवरही भर पडणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, शाळा आणि आरोग्य सेवा यांसारख्या सुविधा सर्व प्रभागांमध्ये एकसमान उपलब्ध व्हाव्यात ही मतदारांची अपेक्षा आहे. नवीन सीमांकनामुळे यापूर्वी दुर्लक्षित असलेल्या वस्त्यांनाही आवाज मिळण्याची शक्यता आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की, “नवी रचनेमुळे जुन्या नगरसेवकांना आपला प्रभाव टिकवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. तसेच नवीन चेहरे व युवा नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात