मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेस पासष्ट वर्षे होत आहेत, या निमित्ताने एक ते चार मे असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वरळी, जांबोरी मैदान येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
वानखेडे स्टेडियम एमसीए लाऊन्ज येथील पत्रकार परिषदेतची सुरुवात संयुक्त महाराष्ट्र लढा आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्य साकार याची ह्रद्य आठवण देणारी चित्रफित दाखवून झाली. शिवजन्मस्थल किल्ले शिवनेरी येथे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे शिवरायांना अभिवादन करताना, राजभवन येथे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रात्री बारा वाजता महाराष्ट्र राज्य नकाशाचे अनावरण करताना, शिवाजी पार्कवर पंतप्रधान नेहरू मार्गदर्शन करताना, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि आपले कॅबिनेट मंत्री आणि उपमंत्री यासह मंत्रालयात आदी संस्मरणीय प्रसंग या चित्रफीतीत होते.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले, हा इतिहास संस्कृतीचा जागर आहे. सायंकाळी 5.30 वाजता शोभायात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील पवित्र नद्यांच्या जलकुंभांसह जांभोरी मैदानावर दाखल होईल. किल्ले पन्हाळगड येथून ज्येष्ठ मंत्री पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी पवित्र मंगल कलशांसह सुरू केलेल्या यात्रेचे राज्यभरात स्वागत होत आहे. उपमुख्यमंत्री, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री पद भूषविलेल्या सर्व माजी मुख्यमंत्री यांचा सन्मान केला जाईल. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल शरद पवार यांना तसेच आपण स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणार आहोत, असे तटकरे म्हणाले.
गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात पाच भव्य माहिती दालने असतील. संयुक्त महाराष्ट्र लढा तसेच महाराष्ट्राची संस्कृती व आजवरची वाटचाल यासंबंधी माहिती ह्या दालनांतून मिळेल. एक में रोजी मान्यवरांचे सन्मान, महाराष्ट्र गौरव गीत मैफल, दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या पाच कर्तबगार महिलांचे सन्मान, तीन में रोजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांचे सन्मान, अवधूत गुप्ते संगीत संध्या, चार मे रोजी गायक रोहीत व जुईली राऊत यांची संगीत मैफल होईल. त्याच दिवशी रात्री गिरगाव चौपाटी येथे पवित्रजल मंगलकलशांचे विसर्जन आपल्या हस्ते होईल, अशी माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली.