उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पक्ष नेत्यांना स्पष्ट संदेश
मुंबई : “सर्वांना मोठी पदं मिळतीलच असं नाही, पण लहान पदं घेऊनही कामाचा आवाका सिद्ध करता येतो. पक्षात मिळूनमिसळून काम करावं,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना व नेत्यांना स्पष्ट आणि ठाम संदेश दिला.
हडपसर येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी आज मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रवेश केला. यावेळी पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षांतील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.
“महादेव बाबर यांनी चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी पूर्वी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद शहरात निश्चितच वाढेल,” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
“अधिवेशनानंतर मी स्वतः राज्यभर दौरा करणार आहे,” असे सांगत पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्याचे संकेत दिले. त्याआधी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे राज्यव्यापी दौरा करतील, असेही त्यांनी जाहीर केले.
पवार म्हणाले, “आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे. स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला हे शिकवलं आहे. त्यामुळे आपण शासनातील विविध खात्यांमधून लोकांच्या प्रश्नांवर काम करत आहोत.”
“पक्षप्रवेश हा सुरुवात आहे. आता नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करावी लागेल. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचं आपलं लक्ष्य असावं,” असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.
पक्षात घेताना व्यक्तींची पार्श्वभूमी, चारित्र्य व प्रतिष्ठा तपासावी, असे सांगत “कोणाचेही वेडेवाकडे धंदे नसावेत. महिलांचा आदर राखला गेला पाहिजे. कुणीही उर्मट वर्तन करू नये. शून्यातून विश्व निर्माण करता येतं — त्यामुळे कुठल्याही कामाचा कमीपणा वाटून घेऊ नका,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सांगितले की, “शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांनीच आपण विकासाची वाटचाल करतो आहोत.” पुण्यात नुकताच झालेला पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला असून, दिवसेंदिवस पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.
“आता हॉलही कमी पडू लागलेत. लवकरच मैदानांवर पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घ्यावे लागतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि संघटना अधिक बळकट करू, आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश नक्की मिळेल,” असा ठाम विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.